18 ।। दशसुन्दरीचरितम् ।। (दौंड ते दिल्ली व्हाया अलिबाग , मुंबई )

 

                       ।। दसुन्दरीरिम् ।।

दौंड ते दिल्ली  व्हाया अलिबाग , मुंबई 

बदलीचं रहाटगाडगं फिरत राहिलं आणि त्याला बांधलेल्या घड्यांसारखे आम्हीही. दौंडला भेटलेली अपूर्व पूर्वा, तर अलिबागला ढगांच्या हिंदोळयांवर बसून येणारी, तर कधी सरसरसर समुद्राच्या लाटांवरून धडकणारी, तर कधी फुलपाखराच्या पंखांसारखी भेटलेली मुलायम पश्चिमा, गतस्मृतींच्या पेटीत जपून ठेवली आहे. अनेक तपांनंतरही त्यांचे रंग मला तेवढेच बहारदार वाटतात. लहानपणी दर गुढीपाडव्याला घरी येणारा दौणा (सुवासीक वासाची वनस्पती. रामाला दौणा प्रिय आहे म्हणून गुढी पाडवा ते हनुमान जयती हा दौणा फुलवाल्यांकडे उपलब्ध असे.) आम्ही आमच्या कपड्याच्या कप्यात ठेऊन देत असू. दरवेळेला कपाट उघडलं की दौण्याचा मंद सुवास आतून बाहेर येई. तसा ह्या सुंदर आठवणींचा सहवास मनाला कायम प्रसन्न करत असतांनाच,------------!!!

समुद्रकिनार्‍याच्या प्रशस्त फुटबॉल ग्राऊंडच्या डी मधूनच किक मारून चेंडू थेट गोलमधे अचूक जावा तसे बदलीच्या एका फटकार्‍याने आम्ही दिल्लीच्या वाटेवर गतीने जात होतो. मधे `व्हायामुंबई जाणार होतो इतकच. प्रवीण दीक्षितांना ``दिल्लीला येता का? विचारताच त्यांनी होकार कळवला होता. असे होकार कळवतांना पत्नी,मुलांना विचारणं हे फार महत्त्वाचं असतं. माझी तर एका पायावर तयारी होती. सर्व सोपस्कार होईपर्यंत एक सहामहिन्यांचं पोस्टिंग मुंबईला होणार होतं.  

दौंडला जन्मलेल्या आमच्या दोन अडिच वर्षांच्या बाबुराव दौंडकर चिरंजीवांनी  दौंडला दौंडचे खडखडाटी हेल काढत, तर अलिबागला कोकणातील हेल काढत बोलायला सुरवात केली होती. नारळाच्या वाडीत दिवसभर मुक्काम टाकून, नारळाच्या  झाडावर चढणे, सापांमागे हिंडणे, समुद्रावरील खेकड्यांच्या मागे धावणे आणि वाळूमधल्या त्याच्या भोकाच्या घरात लुप्त होईपर्यंत त्याचा पाठलाग करणे, मोत्यासोबत वाळूत पावलाचे ठसे उमटवत समुद्रकिनार्‍यावर मनसोक्त भटकत राहणे असे छंद त्याला जडले होते.

असं म्हणतात, एकदा मनु महर्षी (त्यांच नाव सत्यव्रत होतं.)  सकाळी नदीवर स्नानासाठी गेले असतांना सूर्याला अर्घ्य देण्यासाठी ओंजळीत पाणी घेतलं तर ओंजळीत एक चिमुकला मासा आला. मला वाचव म्हणू लागला. सदयपणे त्यांनी तो कमंडलुत ठेवला. पहाटे त्यांना जाग आली तेंव्हा कोणी तरी त्यांना हाक मारत होतं. त्यांनी पाहिलं तर आवाज कमंडलुतून येत होता. कमंडलुतला मासा हाक मारत होता. मला कमंडलू खूपच छोटा पडतो आहे. मला मोठ्या जागी सोड म्हणत होता. त्यांनी पाहिलं तर एका रात्रीत तो चिमुकला मासा कमंडलु एवढा झाला होता. मोठ्या आश्चर्यानी त्याच्याकडे बघत त्यांनी त्याला घराबाहेर असलेल्या पाणी साठवायच्या डोणीत ठेवलं. मासा आनंदानी पोहू लागला. पण परत पहाटे आवाज आला. मासा बोलवत होता. म्हणत होता, ही डोणी माझ्यासाठी फारच लहान आहे. मला मोठ्या तलावात नेऊन सोड. आश्चर्याने मनु ऋषींनी त्याला कसबसं उचलून जवळील तलावात नेऊन सोडलं. पण परत सकाळी जेव्हा त्यांनी तलावातल्या माशाला भेट दिली तेव्हा तो तलावाएवढा मोठा झाला होता. आता तो मला नदीत नेऊन सोड म्हणत होता. नंतर तो मासा नदीच्या पात्रातही मावेनासा झाला आणि मनुऋषींना मला समुद्रात सोड म्हणू लागला. त्यांनी त्या देवमाशाला समुद्रात सोडलं. तेथेही त्याला इतर जलचरांपासून संकट आहे असं सांगून अत्यंत गहन, खोल, प्रलयकारी समुद्रात त्याला सोडायला सांगितले. तेव्हा तो म्हणाला काही दिवसांनी ह्या पृथ्वीवर खूप मोठं संकट येईल त्यावेळी मी तुला मदत करीन. तशी मदत त्याने केलीहीमला तर ही गोष्ट आपलीच आहे असं वाटतं. मनु म्हणजे मननशील, चिंतनशील. अशा विवेकी माणसांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या वेळच्या समाजाने    महा संकटाला तोंड देण्यासाठी घेतलेला समयोचित निर्णय त्या समाजाला तारून गेला. असा हा अमलात आणलेला महत्त्वाचा निर्णय वा संपूर्ण समाजाच्या मनाचा, मताचा कृतीशील प्रवाह हाही मनूच!

लहान बाळाला आईच्या कुशीतच सुरक्षित सुखरूप वाटतं. आणि त्या बाळाला आईची कुस आवश्यकही असते. कमंडलुत असल्यासारखं. बाळाला थोडी थोडी जगाची ओळख होऊ लागली की मूल घरभर रांगू लागतं. त्याचा संचाराचा परीघ थोडा वाढतो. घर, परिवार अशा मर्यादित जागेत ते आनंदात बागडत असतं. मग शाळा, मित्र,  असा परीघ अजून रुंदावतो. बघता बघता एका गावातून एका शहरात एका शहरातून देशव्यापी संचार करणारा तरूण/तरूणी थोड्याच दिवसात संपूर्ण जगप्रवास करू लागतो. ज्ञानप्राप्तीने प्रज्ञा तल्लख होते. विचार गगनला गवसणी घालू लागतात. तर सारं विश्वच परिचित झाल्यानी छोट्या खेड्यासारखं संकुचित वाटु लागतं. मग खरोखरच्या संकटात उडी घेऊन काही वेगळं करायची  इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नाही. महाप्रलयात उडी घेऊन त्यातूनही तरून जाण्याची जिद्द त्याला मनाला स्वस्थता लाभू देत नाही. कुठल्याही संकटाला तोंड द्यायची धमक त्यात निर्माण होते. विश्वसागरात संचार करणारा, अनुभवाने परिपक्व झालेला हा देवमाशासारखा मानव पृथ्वीवर येणार्‍या कुठल्याही प्रळयसदृश संकटातून स्वतःही तरून जातो. जगालाही तारून नेतो. हा सगळा प्रवास ह्या गोष्टीत किती सुंदर सांगितला आहे. 

तसच काहीसं आम्ही अनुभवतही होतो. दौंडला सर्व जग जणु आमच्याभोवतीच फिरत होतं. राज्य राखीव बल गट सात ह्या पलिकडे विश्व संपत होतं. तेथे काम करणं, त्यांच्या सुखदुःखाची, तिथल्या कामाची माहिती होणं प्रवीणसरांसाठी आवश्यक होत. पण ते एक छोटं विश्व होतं. अलिबागला ते रायगड जिल्हाभर मोठं झाल तर मुंबईला अजून विस्तृत. शहराची चमक धमक पाहिलेला आमचा  तीन साडेतीन  वर्षांचा बाळ दादरच्या मायानगरी दुनियेत आल्यावर प्रत्येक दुकानासमोर डोळे विस्फारून बघायला लागला. पावला पावलावर त्याला कुठली ना कुठली नवीन वस्तू वा खेळ अचंबित करायला लागला आणि तो मिळण्यासाठी त्याचा हट्ट सुरू झाला. ठायी ठायी आणि घडी घडी रस्त्यात बसकण मारणार्‍या ह्या बाळाला समजावणं अवघड होतं. पण त्याच्या बाबांनी शोधलेला उपाय मला अवघड वाटला तरी त्याशिवाय उपाय नव्हता. रस्त्यात बसकण मारलेल्या बाळाकडे मागे वळून बघू नकोपुढे चालत रहा असं म्हटलं तरी पहिल्यांदा क्षणोक्षणी काळजीने मागे पाहिले जाई. तो पर्यंत तोही उठत नसे. नंतर मात्र आई बाबा दिसत  नाहिएत आणि मागेही येत नाहीएत हे पाहिल्यावर तो आऽऽऽई करत उठून धावत सुटायचा. एकंदर मागण्यांपासून त्याला सोडवायचा तो राजमार्ग होता.

आता तर मुंबईहून दिल्लीला जायचा निर्णय प्रवीणसरांनी घेतला आणि मीही हो म्हटलं होतं. दौंडच्या छोट्याशा कमंडलूमधून दिल्लीच्या यमुनेत येणं भाग होत. कमंडलूतील उबदार, सुखावह जीवनातून यमुनेच्या प्रवाही विशाल जीवनात आल्यावर नाकातोंडात पाणी जाणं अपेक्षितच होतं. कधी काळी शाळाकॉलेजमधे असतांना मे महिन्याच्या भयानक उन्हात आग्र्याला पायताण काढून तापलेल्या दगडावरून पळत ताजमहाल पाहतांना ``मरो तो ताजमहाल’’ म्हणत आजारी पडल्याची एकच आठवण गाठीला होती. 85 साली दिल्लीचे रुंद, भलेमोठे रस्ते, जिथे पहावं तेथे हिरवळीची विस्तृत मैदानं पाहून डोळे दीपत होते. ``पौडाचं पावनं’’ ही उपाधी आता मला लागू होत होती. एकाद्या मुंगीने जमिनीच्या खाली असलेल्या वारुळाच्या छोट्याशा छिद्राच्या अंधारी रस्त्याने जमिनीवर येताच आकाशाचा विशाल निळा घुमट बघावा, नजर ठरणार नाही अशी हिरवीगार जमिन बघावी आणि तिला स्वतःच्या क्षुद्रपणाची जाणीव व्हावी हे तसं काहीसं होतं. जागोजागी अति प्रचंड उद्यानं, भव्य वास्तू ह्या सगळ्याचं मनावर दडपण आलं होतं.

 घरट्यात राहणार्‍या पिल्लाला घारीनी चोचीनी ढकलून आकाशात उडायला शिकवावंघरट्यातून हेलपाटत बाहेर पडलेल्या पिलाने पंख पसरता पसरता दोन चार गोते खाततोल सावरत पंख पसरावेत तसं दौंडच्या चिमुकल्या उबदार गावातून हलकेच थोड्या मोठ्या रायगड जिल्ह्यात आमचं बस्तान बसत असतानाच  दिल्लीचे बोलावणे आल्याने रायगडच्या घरट्यातून शेजारच्याच मुंबईच्या फांदीवर काळाने आम्हाला उडवून दिलं.   आता पंख फडफडवत छातीत हवा भरून घेत  मुंबई बघत दिल्लीच्या दिशेनी झेप घेणं क्रमप्राप्तच होतंआकाशात उडायला लागलं की   पिल्लाला खर्‍या क्षितिजाचा विस्तार कळावा तशी काहीशी दिल्लीची बदली होतीजशी चार गावं तशीच दिल्ली ह्या कल्पनेला छेद देणारे अनुभव माझी फजिती करायला टपलेले होते.

   ठेच लागावी आणि तो चिंतामणी निघावाबुडतो बुडतो म्हणून आक्रोश करावा तर तो अमृताचा सागर असावाअशी दिल्लीची बदली आणि उत्तरेची नवी ओळख होतीचालणारं मुल पडणारच आणि कमरेभर पाण्यात पोहायला उतरल्यावरही नवखा दोनचार गटांगळ्या खाणारच कीपळता पळता पोर पडलं तरी रडणार्‍या पोराला आई हसत हसत उचलतेआणि पाण्यात गटांगळ्या खाणार्‍यालाही त्याचा शिक्षक दोन चार गटांगळ्या खायलाच पाहिजेत म्हणून निर्विकारपणे सांगतो.

दिल्लीचं 12 वर्षांचं लांबलचक पण दोन टप्प्यांमधे केलेलं वास्तव्य; Lutyens'  Delhi च  ‘‘प्रथम तुज पाहता!’’ असं आश्चर्यकारक झालेलं भव्य, दिव्य दर्शन; दिल्लीचे रुंदच रुंद गुळगुळीत रस्ते--- त्या भव्य--- अति भव्य रस्त्यांची औरंगजेब(?), अकबर(?) तर छोट्याशा लेनचं पृथ्वीराज चौहान अशी नावं पाहून  ‘‘हे काय हे? ----ही नावं कशी शक्य आहेत?’’ अशी मनात निर्माण झालेली खळबळ, तर भीष्मपितामह मार्ग, महर्षी वाल्मीकी पथ ही  नावं वाचून सुखावलेले क्षण; चौकाचौकातील भली मोठी सर्कल्स;  अति अति भव्य बागा; जागतिक नियमांच्या सर्व अटी, आवश्यकता पूर्ण करणारी जागतिक स्तराची भव्य स्टेडियम्स्; जागोजागी हिरव्या,पोपटी मुलायम हिरवळींची विस्तृत मैदानं (आता ही  अस्तित्वात नाहीत ); हे दर्शनी दिल्लीचं आकर्षक रूप! राष्ट्रपती भवन, लोकसभा, तालकटोरा स्टेडियम, नेहरू स्टेडियम, चांदणी चौक, जनपथ अशी  ऐकलेली अनेक भव्य नावं अचानक समोर दिसली की धन्य वाटत असे.

तेव्हा घरासमोरही प्रचंड मोठ्या हिरवळी पसरलेल्या असत. रात्री  फिरायला कोपर्‍यावर गेलं तरी उंचसखल जागेवर इराणी गालिचा उलगडत गेल्यासारख्या गुबगुबीत हिरवळीनी सुंदर रीतीने झाकल्याने ते उंचसखल भाग कमनीय हिरवळ लाटा वाटत. तेव्हा लग्नात हुंड्यात मिळालेल्या गाड्यांव्यतिरिक्त वैयक्तिक गाड्या नाहीच्या बरोबरच असत. गाड्या आल्या आणि पार्किंगसाठी त्यांनी हिरवळी पोटात घेतल्या.

महाराष्ट्रसदन हे दिल्लीलाही आमची काळजी घेणारं माहेर होतंनंतर वारंवार बदली झाली आणि दिल्लीच्या भोज्याला हात लावायची वेळ आली की घर मिळेपर्यंत महाराष्ट्रसदन आम्हाला सांभाळत असे. महाराष्ट्र सदनच्या जवळ असलेल्या पंजाब भवनहरियाणा भवन मधे रुचीपालट म्हणून जेवायला गेलं तरी स्वागत असेजवळ असलेलं बंगाली मार्केट दिल्लीच्या समृद्ध  खाद्य   संस्कृतीची ओळख करून देत असेत्यावरून गंगायमुनेच्या खोर्‍याच्या सुपीकतेचं अनुमान करता यायचंतोवर तुपात केलेल्या भाज्या माहित नव्हत्यात्या माहित झाल्याटोकन सरकवताच नळातून थेट खाली ठेवलेल्या बरणीत पडणार्‍या दुधाची गंमत वाटायची.  घर मिळालं.सुदैवानी घराला तीन दिशांना सुरेख प्रशस्त सज्जे होते.  मुख्य सज्जात रात्री आले तर काय! समोर सप्तर्षींचं पतंगाच्या आकाराचं नक्षत्र उत्तर दिशाभर पसरलं होतं. नाकासमोरच ध्रुव तारा चमचमत होता. खरोखरच तो एका जागी राहतो का हे पहायला रात्री दोनतिनदा तरी मी उठून पाहे आणि डोळे मिचकावत तो माजं स्वागत करे. सप्तर्षिंचं डोक खाली जाऊन शिर्षासन झालेलं असे तर इंग्रजी M किंवा W आकाराचं शर्मिष्ठा नक्षत्र वर चढलेलं असे. सप्तर्षीं भोवती फुगडी घातल्यागत फिरणारी ही दोन नक्षत्र माझे सोती होऊन गेले असतानाच एक नवीन मित्र मिळाला. कारण तेव्हा लेव्ही शूमाकर नावाचा धूमकेतू असंख्य दिवस उत्तरेला त्याची शेपूट पसरून मुक्कामाला होता.  काही दिवस दगड, गोटयांच्या रूपात पृथ्वीवर बरसत राहिला आणि एक दिवस संपला.

भव्यतेची अनेक परिमाणं दिल्लीत राहून अनुभवली. लहान असतांना रेडिओवरून 26 जानेवारीला दिल्लीतील प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या संचलनाचे/परडचे धावते वर्णन ऐकतानाही मन भरून येत असे. आता दिल्ली मुक्कामात 26 जानेवारी/ भारताच्या प्रजासत्ताक संचलनाचे पास आपल्या पतीच्या हुद्द्यामुळे मिळून सन्मानपूर्वक राखीव जागांवर बसून अत्यंत जवळून प्रत्यक्ष डोळ्यांनी पहायला मिळाली हयाचा आनंद अपूर्व असे. दिल्लीत असेपर्यंत ह्या संचलनाला उपस्थित राहण्याची एकही संधी मी गमावली नाही. अनेकजण आपल्याला हे संचलन पहायला मिळावे ह्यासाठी इच्छुक असूनही त्यांना ते जमत नाही आणि आपल्याला दरवर्षी निमंत्रण येऊनही आपण जायचं नाही हा मला नतद्रष्टपणा वाटे. त्या संचलनाचा आब, ऐट, ऐश्वर्य पाहिलं की आपण भारतासारख्या महान देशाचे नागरिक आहोत  ह्याचा वारंवार सार्थ अभिमान वाटून डोळे भरून येत.

भारताच्या प्रत्येक स्वातंत्र्यदिनी (15ऑगस्ट) लाल किल्ल्यावरून होणारे पंतप्रधांनांचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकणे ही दिल्लीच्या बदलीसोबत मिळलेली मोठी बक्षिसी होती. पंतप्रधान अटलबिहारीजींचे भाषण ओघवते अभ्यासपूर्ण आणि लालित्यपूर्णही असे; तर नरसिंह रावांचे भाषण ऐकणे हाही एक विलक्षण अनुभव असायचा. आपली उद्दिष्ट आणि त्याची केलेली पूर्तता असा अभ्यासपूर्ण लेखाजोखा ते मांडत. त्या कालखंडात देवेगौडा आणि गुजराल ह्याही पंतप्रधानांना  अनुभवता आलं. लाल किल्ल्याची भव्यता आणि त्या शिस्तबद्ध कार्यक्रम अनुभवताना स्तमित व्हायला होत असे. मुघल आणि टोपीकर इंग्रजांनी भारताला शेकडो वर्ष लुटल्यानंतरही परत एकदा राखेतून उभ्या राहणार्‍या फनिक्स पक्षासारखा भारताचा बुलंद हौसला आपल्यालाही भरारी घेण्याचा जोम देऊन जात असे.

 14 नोव्हेंबरला सुरू होणारं आणि 30 नोव्हें. पर्यंत चालू राहणारं प्रगति मैदानवरचं भव्य प्रदर्शन दोन तीन दिवस जाऊनही कधीच पूर्ण पाहून व्हायचं नाही. तेथे प्रत्येक प्रांताच्या भव्य दालनांमधे त्या त्या  प्रांताच्या मिळणार्‍या विशेष गोष्टी बघता बघता आणि आपल्याला पाहिजे त्या चुटपुट गोष्टी घेतांना हातातल्या पिशव्या कधी भरून ओसंडून जात ते कळायचं नाही. दिल्लीत भरणारे मेळे हे संपूर्ण भारताचं दर्शन घडवणारे असतयेणारी प्रदर्शनं भारतभरच्या सुंदर सुंदर वस्तुंनी सजलेली असतप्रत्येक गोष्ट विकत घेऊन घरी आणून ठेवायलाच पाहिजे असे नाही पण निदान आपल्या देशातील कलाकारीची ओळख तर होतेजागतिक प्रदर्शनात तर जगभरच्या सुंदर गोष्टी मनाला मोह घालतआफ्रिकेहून आलेल्या प्राण्यांच्या लाकडी प्रतिकृती इतक्या प्रमाणबद्ध आणि कमनीय असत की त्यांच्यावरून नजर हलत नसे.

 अशाच मेळ्यांमधे कलकत्याच्या कंथाजामदानीमहाराष्ट्राच्या पैठणीपंजाबच्या फुलकारीबिहारच्या मधुबनीगुजरातच्या बांधणीलहेरियापाटन पटोलाएम्पीच्या इंदुरीचंदेरी आसामी मुंगाबनारसी शालूकांजीवरम्बालुचेरी, शिफॉन जॉर्जेट, ओरिसाच्या बोमकईसंबळपुरी अ‍ॅप्लिक वर्क -------- अशा प्राचीन काळापासून आत्ता पर्यंत स्त्रीवर्गाला सजवणार्‍या, न संपणार्‍या साडीप्रकारांची ओळख झाली. तर काश्मिरी गालिचे, बदाम आणि केशरफुलांचा मध, जम्मूचे अक्रोड, नॉर्थइस्टच्या बांबूच्या आणि इतर कलाकृती, कर्नाटकच्या चंदनी, हस्तिदंती आणि इतर कलाकृती, उत्तर प्रदेशच्या धातूच्या वस्तू तर महाराष्ट्राच्या अनेक लोकोपयोगी गोष्टी, सेलमचा साबूदाणा अशा अनेक अनेक गोष्टींनी प्रदर्शन ठासून भरलेले असे भारतातील हस्तकलेचा जगात कोणी हात धरू शकणार नाही.

दर लीप इयरला फेब्रुवारी पाच ही तारीख  जागतिक पुस्तक प्रदर्शनासाठी नक्की असे. अशा वेळी काय पाहू आणि काय नको असं होत असे.  दर वर्षी भारतीय पुस्तकांच्या प्रदर्शनात महाराष्ट्राव्यतिरिक्त  केरळ, कर्नाटक, बंगाल,ओरीसा, अशा विविध प्रांतांमधून येणारी प्रथितयश लेखकांची अत्यंत नवीन विषय हाताळणारी पुस्तकं वेड लावून जात.  पुस्तक प्रदर्शनातून मुलासाठी घेतलेली CBT(children’s book trust ) ची पुस्तकं असोत वा डिस्नेचा अत्यंत उपयुक्त सचित्र एन्सायक्लोपिडिआ असो आज त्याची मुलं वापरत आहेत. बाकीच्या देशातील पुस्तकं महाग असली तरी तेथे वाचायला, पहायला मज्जाव नसे. मुलांसाठी रशियन सचित्र पुस्तकं मात्र स्वस्त आणि सोप्या इंग्रजीत असत.

मे महिन्याच्या उन्हाळ्यात आमच्या शेजारीच असलेल्या नेहरू स्टेडियमच्या बाहेरच्या भल्या मोठ्या ग्राऊंडवर एक वेगळीच गम्मत असे. ''हॉट बलून महोत्सव!'' विविध देशांचे स्पर्धक  आपले खोलीच्या आकाराचे  रंगिबेरंगी भले थोरले बलून्स घेऊन दाखल झालेले असत. बलून मधे सर्वात खाली असलेल्या wicker basket  मधे बलून ऑपरेटर्स लोक आणि liq. propane gas tanks  असतात. त्याच्यावर बर्नर्स असतात. gas cylinders चा valve  कमी जास्त प्रमाणात उघडून operators वरचे दोन्ही burners सुरू करतात. त्याच्या प्रचंड ज्योतीने नॉयलॉन च्या भक्कम कापडाच्या बलून मधली हवा गरम होऊन हळु हळु हलकी व्हायला लागते.  हवा गरम होऊ लागली की बलून अंगात धुगधुगी आल्यासारखा हलु लागे, डोलू लागे आणि हळूच जमिनीचे नाते सोडून आकाशात वर वर जाऊ लागे. हया बलूनच्या डोक्यावर/टाळूवर एक पॅरॅशूट व्हॉल्व असतो. तो बंद वा उघडून बलून पाहिजे त्या उंचीवर ठेवता येतो, वर वा खाली जमनीवरही सावकाश आणता येतो. एखाद्या सकाळी असे  तीस एक गुबगुबीत बलून्स गाल फुगवून आकाशात प्रस्थान करताना पहाणे मोठे  गोंडस दृश्य असे.  आकाशाकडे नजर लावून त्यांच्या हालचाली बघणे जेवढे आनंददायी असे तेवढेच  घराच्या खिडकीतून  असे आकाशकंदिल तरंगत जाताना पाहून, मनात विचार येई, आमच्या आधीच्या पीढ्यांची आयुष्य स्वातंत्र्य मिळवण्यात आणि गरीबीशी झुंझण्यातच कामी आली. आम्हाला किमान अशा छान गोष्टी पाहून त्यांची स्वप्न तरी पहायची मुभा आहे.---- आता आमच्या खांद्यावर उभ्या असलेल्या पुढच्या पिढीला, भारताच्या सामान्य मुलांनाही लवकरच  हे सर्व खेळ खेळण्याची सक्षमता आणि आर्थिक ऐपत येवो. 

ह्या शिवाय भारताच्या राजधानीत आपली कला पेश करण्यासाठी येणार्‍या उत्तमोत्तम गायकांची गाणी,  बिस्मिल्लाह खान यांची सनई, झाकीर हुसेनजींचा तबला, हेमामालिनीचे नृत्य, उत्तमोत्तम चित्रकारांचे चित्रप्रदर्शन अशा अनेक कलांचा सहज आस्वाद घेता येत असे. जे मराठी सिनेमे महाराष्ट्रात क्वचित पहायला मिळत ते दिल्लीदरबारी सहज उपलब्ध  असत. जागतिक सिनेमांचे महोत्सव सहज शेजारीच असलेल्या ऑडिटोरियम मधे पहायला मिळत. देशाच्या राजधानीत आणि तेही मोक्याच्या जागी रहायला मिळणं ही  आईस्क्रीम वरची चेरी होती.

ह्या कार्यक्रमांची वाईट बाजू ही असे की कार्यक्रम कितीही चांगला असला तरी रात्री नऊ वाजायच्या आदीच थोडावेळ सर्व रसिक उठून जाताना पाहून कलाकार नाराज होत. पण शेवटची बस नऊला असे आणि स्वतःचं वहान ही तेव्हा दुर्मिळ गोष्ट होती. समजा एखाद्याकडे स्वतःचं वहान असलं तरी दिल्लीला आठ नऊ नंतर एकटं फिरायची दहशत वाटायची.

थंडीसोबत दिल्ली फुलांनी सजायला सुरवात होई.  रस्त्याच्या कडेच्या छोट्या छोट्या जागासर्कल्स सुंदर सुंदर फुलांनी बहरून जात.फुलणारे, आनंदाने डोलणारे अत्यंत सुंदर रंगिबेरंगी सदा टवटवीत फुलांचे ताटवे मनाला वेड लावत. गुलाबपिटोनिया फ्लॉक्सपॅन्सी Pansies सर्व प्रकारच्या शेवंतीडेलिया ग्लॅडिओलाअ‍ॅस्टरकार्नेशनकॅलेंड्युलामेरीगोल्डअ‍ॅलिसम----- अनेको अनेक रंगिबेरंगी फुलांनी दिल्ली आजही सजतेआता डोळ्यांचं पारणं फेडणारी ट्युलिप्सही आहेतदिल्लीचं हे रूप अप्सरेला लाजवणारं असेविशाल विशाल बागा फुलांनी ओसंडून वहात.मुंबईला त्रिकोणी पंचकोनीवेड्यावाकड्या आकाराच्या इवल्या टिवल्या बागा पाहिल्यानंतर दिल्लीच्या बागा म्हणजे विशाल नंदनवनच असे. एक मार्चच्या सुमारास सर्व नागरिकांसाठी खुले होणारे राष्ट्रपतींचे  अमृत उद्यान ( तेव्हा मुघल गार्डन्स म्हटले जात असे) डोळ्याचे पारणे फेडित असे. अंगोपांग बहरलेली फुलझाडं, त्यांचे  विविध रंगांचे ताटवे, हिरवळी, कारंजी बघता बघता दोन तीन तास कसे निघून जात ते कळतच नसे. कुठल्या गार्डन मधे गुलाबाचा तर कुठल्या बागेत शेवंतीचा महोत्सव सुरू झाला की आम्ही आवर्जून पहायला जात असू.  दोन तीन तास फिरूनही सर्व गुलाब वा शेवंतीचे रंग पाहून होत नसत. 

साधारण जून जुलै मधे  जागतिक आंबा महोत्सव असे. सागरगोट्या एवढ्या आंब्यापासून चार-पाच किलोच्या पपईलाही लाजवणार्‍या आकाराचे हिरवे, केशरी, मरून अशा  विविध रंगाचे विविध देशांचे आंबे पाहताना कुतुहल वाढत असे. 

   आमच्या घरापासून जवळ असलेली लोधी गार्डन आम्हीही जवळ केलीआणि तिचा जास्तीतजास्त आनंद घेतला. रोज संध्याकाळी लोधी गार्डनमधे फिरायला जाणे तथे असेपर्यंत आम्ही चुकवले नाही. ह्या बागेला लागूनच असलेले इंडिया इंटरनॅशनल सेंटर आणि तेथे होणारे  जागतिक दर्जाचे  कार्यक्रम, उत्तमोत्तम वक्त्यांची भाषणं हे सर्व सर्वांना खुले असल्याने अनेक भाषणं कार्यक्रम आम्ही पाहून येत असू.

ह्या बागेच्या प्रवेशद्वारातच असलेली दीपमाळ किंवा रक्षक उभा राहण्यासाठी बांधलेला वॉच टॉवर, आतमधील शंकराच्या देवाळाचे केलेलं थडग्यात केलेलं रूपांतर, आत असलेले बाकी देवांचे रिकामे कोनाडे, थडग्याच्या बरोबर वर अभिषेक पात्र टांगण्याची तुटलेली साखळी, मंदिराच्या ओवर्‍या सर्व काही दिसत असून त्याला लोधीचा टोंब म्हणायचा अगोचरपणा सहन करणार्‍या जनतेला येथील जुलमी सत्तेनी किती दबवल किंवा पाताळातच गाडलं असेल हयाचा विचार करताना त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने शिवाजी महाराज, पहिला  बाजीराव आणि थेट नाना फडणवीस असेपर्यंत आणि नंतरही टिळक, आगरकर इत्यादि महान नेत्यांमुळे चाखलेल्या स्वातंत्र्यामुळे आपण किती स्वतंत्र विचार सहज करू शकतो हे जाणवलं. त्या महान नेत्यांची महानता पहिल्यांदा कळून आली.

त्याउलट दिल्लीकरांच्या कायम बोकांडी बसलेली मुघल राजवट सांस्कृतिक, मानसिक ,वैचारिक केवढी हानी करून गेली! मुघलांचं बडेजावी बनावट वागणं आजही तेथील लोकजीवनावर मानसिक, सांस्कृतिक दबाव ठेऊन आहे. स्त्रियांवरील अत्याचार आणि त्यांना पळवून नेणे ह्या मुघलांच्या भयाने रात्री बारा वाजता सर्व वर्‍हाड गेल्यावर लग्नाचे फेरे उरकणे आणि रात्री बारात घरी आणणे, लग्नाला घरच्या स्त्रियांनी उपस्थित न राहता घरी राहून नवटंकी करून घरात पुरूष माणूस असल्याचे भासवणे हे आता तरी झुगारून द्यायला पाहिजे. असो!!

 दिल्लीच्या भव्य बागांबद्दल सांगत होत.  बागेत फिरताना भारताचे अनेक कॅबिनेट मंत्री, भारत सरकारचे अनेक सेक्रेटरी, वैजयंतीमाला सारख्या सिनेमातील तारका सहजपणे पहायला मिळत तर कधी पायातल्या बुटाची लेस सुटली तर अंगरक्षकांना बांधायला लावणार्‍या आपल्या थोर परिवाराच्या मस्तीत वावरणार्‍या शेंबड्या तरुणीही दिसत. अशा अगणित बागांनी दिल्ली समृद्ध आहे.

दिल्लीच्या भव्य बागांमधे फिरायची मजा जशी और तसा तेथील भव्य स्टेडियम्सचा आपण लाभ उठवणं मोठं आनंददायी असे. तेथे आपल्या मुलांना सहज ऑलिंपिक दर्जाचं मिळणारं हॉकी, फुटबॉल, अ‍ॅथलॅटिक्स, पोहणे अशा विविध—--खर तर म्हणू त्या खेळाचं ट्रनिंग सहज उपलब्ध असे. जागतिक दर्जाचे कोच मुलांना तळपवण्यासाठी सज्ज असत.  घराजवळ असलेल्या नेहरू स्टेडियमचा जास्तीत जास्त लाभ उठवत आमचा मुलगा हॉकी, फुटबॉल ऑलिंपिकमधे  चमकदार कामगिरी करणार्‍या कोचेस कडून शिकला.

दिल्लीला रहायचं असेल तर शारिरीक फिट्टच असायला पाहिजे हे लक्षात आल्यावर आम्हीही नियमित जॉगिंग आणि इतर व्यायाम सुरू ठेवला. आणि त्याची उत्तम फळं पाहिल्यावर पुढेही सुरूच ठेवला. 

 थंडीसोबत सुरू होताच दिल्लीकरांच्या बाहेर निघणार्‍या मॅचिंग शाली, कोट, स्त्री,पुरुष, मुले ह्यांच्या अंगावर वुलन्सचा फुलणारा रंगिबेरंगी फुलोरा, तेथील अजमलखाँ आणि तत्सम सर्व मार्केट्स मधे येणारे सुंदर स्वेटर, कोट, टोप्या, लहान शिशुंसाठी सुंदर वुलनसेट पाहून मन हरखून जाई. दिल्लीला घेतलेला लांब कोट घालून थंडीत बाहेर फिरताना मला आपण हॅलिवुडच्या कोणी प्रसिद्ध तारका आहोत असा सुखद भासही होई.

ऑक्टोबर सोबत दिल्लीचा थंडीचा मोसम आणि eating season  दोन्हीही बरोबरच सुरू होत.लालचुटुक लांबलांब गाजरंभले मोठे पण कोवळे हस्तिदंती मुळेपोत्यांनी ओतला जाणारा मटारफुलगोबीपत्तागोबीसरसोका सागमेथी------ अशा अनेक भाज्यांनी बाजार भरून जातइतरवेळेला भव्य गोष्टी पाहून डोळेच विस्फारत असत पण आता भारतभरच्या विविध खाद्यपदार्थांची ओळख झाल्याने तोड विस्फारून खाऊही लागलोआता जरी सर्व पदार्थ सर्व ठिकाणी मिळत असले तरी तेव्हा दिल्लीबाहेर त्यांचे प्रस्थ एवढे वाढले नव्हते. आत पोकळ खड्डा असलेला काला जामूनटेनिसबॉल एवढा राजभोगचा गोलसूजीच्यारव्याच्या पुरीचे खसखुशीत गोल गप्पेपाणीपुरीभल्ला चाट, उडद की कचोरी, प्याजकी कचोरी, भले मोठे सामोसेकुल्फी फालुदानिरुलाचं आइस्क्रीम बिहारचा लिट्टी चोखाखव्याचे अनरसे, राजगिरचा खाजाराजस्थानी दालबाटी लखनऊचे गजक, यच्चयावत सर्व बंगाली मिठाया त्या शिवाय छोलेभटुरेराजमा-चावल, सरसोका साग और मक्केकी रोटी, कुलचे आलूगोबीपनीर पराठेगाजर हलवा हे तर नेहमीचेच असत.----- नवरात्रात रामलीला मैदानावर रामलीलेच्या जोडीने तेथे फळे आणि खाद्यपदार्थांनी सजलेले भव्य स्टॉल्स बघत रहावेत असे असत तेथील खास मॅगो कुल्फी आंब्यातच मिळेहा आंबा वरतून जराही काळा  पडलेला नसेत्यातील आतील कोय कशी काढून घेत असतील आणि आब्यांच्या गराचा जाड थर करकरीत न होता आत कुल्फी कशी भरत असतील हे आजही कोडच आहे  अशा अगणित पदार्थांना आम्ही आमच्या पोटात सामावलं. आमचे शेजारी राममोहन हे DG.  BSF   होतेत्यांना बांगलादेशासोबत चर्चावाटाघाटी करायला जायला लागेत्यांना दिल्या गेलेल्या मिठाईतील अत्यंत मृदुल आणि आकाराने टेनिसबॉललाही मागे टाकेल असा  रगुसल्ला आमच्याकडे चालत येत असे तर आमचा हापूस त्यांच्या घरी जात असेउत्तरेनी हातात धरले हात हातावर बराच खाऊ ठेऊन गेला. उत्तरेनी दिलेली शिदोरी आजही मनाला प्रसन्न ठेवते. किलोंनी  मिठाया, दिल्लीच्या सढळ / वारेमाप तुपात बनणार्‍या  भाज्यांपासून भज्यांपर्यंतच्या खानपान सवयी, पेशावर ते ढाक्कापर्यंतच्या सर्व मिठायांचं सीमा सोडून मुक्त/ अनिर्बंध संक्रमण, दिल्लीकरांची बडेजावी लग्नं, डोळे दीपवणारे कपडे आणि ज्वेलरी  ---------- अशा अनेक अनेक चांगल्या वाईट गोष्टींमुळे दिल्लीनी डोळे विस्फारायला लावले. 

ह्या सर्व भल्या बुर्‍या गोष्टींसोबत एक मात्र नक्की की, दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने तेथे कायम ह्या ना त्या देशाचे पंतप्रधान, मंत्री, सेक्रेटरी, तसेच अनेक देशांमधील, अनेक क्षेत्रांमधील नावाजलेले एकाहून एक सरस लोक येत राहतात. त्यामुळे सर्व प्रसार माध्यमांचे झोत त्यांच्यावरच एकाग्र झाल्याने, ‘‘अमक्या दारुड्याने दारू पिऊन गोंधळ घातला, पर्वती तीनदा सलग चढण्याचा विक्रम, रांगोळी स्पर्धेचं यश, घरात घुसला बिबळ्या, गाढवाने घोड्याच्या पायाला घेतला चावा------’’ अशा लोकरुची समाचारांमधून सुटका झाली. गल्ली ते दिल्ली प्रवासासोबत ठिणगी, प्रहार, संध्या अशी स्थानिक वार्तापत्रे ते हिंदू, ट्रिब्यून, स्टेटस्मन----- असाही प्रवास झाला. सतत जागतिक विषयांवर येणार्‍या वार्ता, चर्चा, भाषणं, प्रदर्शनं ह्यामुळे भोवतालच क्षितीज विस्तारत गेलं. दिल्ली तुम्हाला जागतिक विचार करायला शिकवते. जागतिक प्रश्न, त्यांचा भारतावर होणारा परिणाम, संपूर्ण भारताच्या कल्याणाचा विचार करायचा असेल तर दिल्लीत राहिलच पाहिजे. इतकं तरी कळलं.

दिल्लीच्या जगाचं वेगळेपण शाळेतही झिरपलं होतंसर्वच ठिकाणी प्रतिबिंबित होत होतंदिल्ली सतत अनेक देशांच्या संपर्कात येत होतीअनेक देशांचे महत्त्वाचे लोक सतत दिल्ली भेटीला येत असतत्याला अनुरूप आज कुठल्या देशाचे पंतप्रधानअध्यक्ष दिल्लीत आले आहेत वा भारत भेटीला आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तीची माहिती मुलांना सांगितली जायचीत्यानिमित्ताने जगाच्या नकाशावर त्या देशाचा नकाशा दाखवला जायचातो देशत्याचा झेंडा तेथीलभाषा आणि थोडी माहिती नर्सरीपासूनच मुलांना मिळत असेजवळपास राहणार्‍या विविध देशाच्या डिप्लोमॅट्सना शाळेत बोलावून त्यांच्या देशाचीत्यांची थोडक्यात माहिती देऊन मुलांबरोबर त्यांचा संवाद असेथोडी मोठी मुलं त्यांची मुलाखत घेतजागतिक घडामोडींचा सहज लोकल पेपर्समधे  सामावेश असेइतके दिवस दौंडरायगडला तेथील संकुचित छोट्याशा जगाच्या बातम्या आणि त्याच त्या एस्पीकलेक्टर च्या स्थानिक बातम्यांनी पेपर भरून गेलेला असे. त्या स्तुती चिखलातून वा वर्तमानपत्रांनी केलेल्या चिखलफेकीतून बाहेर आल्यावर आपलंही जग विस्तारल्याची भावना छान असेसर्व भारतातील महत्त्वाच्या बातम्यांनीनवीन दिली गेलेली जजमेंटस्जागतिक घडामोडीह्यांनी हिंदूसारखी वृत्तपत्र ठासून भरलेली असत.

देशाच्या एखाद्या कोपर्‍यातल्या एखाद्या जिल्ह्याच्या मर्यादित जागेत येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाने ठोकलेला कडक सॅल्यूट साहेबाच्या बिब्बीलाही आपण म्हणजे जणु काय सुपर ख्लिओपाट्रा तर त्याच्या शेंबड्या 2-3 वर्षाच्या मुलालाही आपण सुपर साहेब वाटायला लावतो त्या भंपक कोशातून बाहेर पडून हा वैश्विक होण्याचा अनुभव तुमचं जग विशाल करतो.

दौंड, अलिबाग, पुणं मुंबई नंतर दिल्लीमुळे नुसता गल्ली ते दिल्ली असा अंतराचाच नाही, नुसता परिसराचाच विस्तार नव्हे तर विचारांच्या जगाचाही विस्तार होणारा आहे. दिल्लीला जातांना दक्षिणेचा हात नर्मदेच्या किनार्‍यावर सुटला. उत्तरेनी धरलेला हात आईचा हात सोडून शाळेतील कुणा नवख्या बाईंनी हातात घ्यावा तसा पहिल्यांदा अज्ञानामुळे छाती दडपवून टाकणारा, रडू कोसळेल की काय असा वाटणारा, पण नंतर मात्र अनुभव समृद्ध करून गेला.

 उत्तमोत्तम वक्त्यांची सहज ऐकायला मिळणारी भाषणं; उत्तम गायक, वादक, कलाकारांच्या सहज ऐकायला मिळालेल्या मैफिली; उत्तमोत्तम चित्रकारांची प्रदर्शने; उत्तमोत्तम अभ्यासक्रम राबविणार्‍या आणि जागतिक विचार करायला शिकवणार्‍या शाळा, मुलांची वाचनालये; CBT (Children’s Book Trust), NBT (National Book Trust), एका बाजूला तर - ------ -

दुसर्‍या बाजूला अजून एक गोष्ट होतीती म्हणजे, तेथील वर वर अत्यंत शालीनगोडबोली पण प्रत्यक्षात अत्यंत aggressive/आक्रमक वृत्तीची बेगडी संस्कृती— ! शारिरीक, मानसिक परीक्षा बघणारी!   हातोहत फसवणारी छोटीच का मोठीही माणसं, प्रतिष्ठेच्या भंपक कल्पना, दिल्लीचा प्रचंड उन्हाळा आणि त्यात गायब होणारी वीज, भयंकर वेगाने चालणारी ‘‘लू’’(वस्त्रगाळ रेतीची प्रचंड वादळं) ह्या प्रकारची तोंडओळख; दिल्लीची कडाक्याची थंडी, थंडीत इराणकडून भारताकडे सरकणार्‍या ढगांचा मौसमी पाऊस, दाट कोहरा(धुकं) ह्यांचा जवळून परिचय देउन जाई. उत्तरेची ओळख मनात कधी दडपण आणणारी असे तर कधी आश्चर्याने व्वा! म्हणायला लावणारी तर कधी  गळाला लावलेल्या आमीषाप्रमाणे समोरच्याची अत्यंत गोड बोली आणि विपरीत वागणूक मनाला सतत सावध करणारी असे!

सगळ्यात तग धरणं महत्त्वाचं होतंतसेही आमचे फादरगॉडफादरनातेवाईकलांबचे ओळखीचे कोणीही दिल्लीला नसल्याने आमची लढाई आम्हालाच लढायची होतीमाघार  घेणं शक्य नव्हतंएकाला घरच नव्हत तर दुसर्‍याला घराचे दरवाजे बंद होतेम्हणजे एकंदर मागचे दोर कापले असल्याने आहे त्या परिस्थितीला तोंड देणं हा एकमेव पर्याय होता. 

-------------------------




              

               

----------------------------------








थोड्याच दिवसात त्रासदायक वाटणार्‍या सर्व फालतू गोष्टी  मनाच्या कोपर्‍यात सरकल्या.  दिल्लीतील उत्तम गोष्टींचा मन शोध घेऊ लागलं. 

 

दिल्लीच्या दोनवेळच्या पोस्टिंग्ज च्या मधे सुदूर उत्तरेने हाताला धरून जणु कडेवरच उचलून घेतलं. तो लेहच्या कुशीतला उत्तरेचा सहवास ‘‘नाते लडाखशी’’ ह्या पुस्तक रूपात आहेच.

त्याची लिंक ही  देते. जरूर वाचा  (नाते डाशी )

दिल्लीतला अत्युत्तम अभ्यासक्रम, मुलाला मिळालेली सरदार पटेलसारखी गुणी शाळा, दहावीत त्याचं मेरिटमधे येणं, ही देवाची पूर्वनियोजित  योजना आमच्यावरच्या प्रचंड वात्सल्यापोटीच होती हे लक्षात यायला मात्र जीवनाचा उत्तरार्ध यावा लागला. दिल्ली सोडायची वेळ आली आणि घसरगुंडीवरून सहजपणे घसरत खाली यावं तसं मोठ्या मजेत आम्हाला पदरात घ्यायला नागपूरसारखं सुंदर शहर वाटच बघत होतं.

 महाराष्ट्रात परत येताना आमचा हात धरून बदली नामक घसरगुंडी थेट नागपूरलाच घेऊन आली. 

---------------------------

 

 


Comments

Popular posts from this blog

पुस्तके (अनुक्रमणिका)

।। दशसुन्दरीचरितम् ।। (अनुक्रमणिका)

1 ।। दशसुन्दरीचरितम् ।। (माझ्या जीवाभावाच्या दहा मैत्रिणी -)